ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे संस्थापक शब्बीर अहमद अन्सारी यांना बोईसरमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली
बोईसर (वार्ताहर): ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक स्वर्गीय शब्बीर अहमद अन्सारी यांच्या निधनानिमित्त आज, १९ एप्रिल २०२६ रोजी बोईसर येथील भैयापाडा स्थित ‘दारुल उलूम गौसिया’ मदरशामध्ये ‘दुआ-ए-मगफिरत’ (मृतात्म्यास शांती लाभण्यासाठी प्रार्थना) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २२ मार्च २०२६ रोजी शब्बीर अहमद अन्सारी यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याची दखल घेत संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभरात त्यांच्यासाठी कुराण पठण आणि प्रार्थना सभांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे पालघर जिल्हाध्यक्ष आशाद बने शेख यांच्या अध्यक्षतेखाली हा विशेष कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगी दारुल उलूम गौसिया मदरशाच्या मुलांनी कुराण पठण केले, त्यानंतर मदरशाचे मुफ्ती, कारी आणि मौलाना यांनी तिलावत सादर केली. या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रफीक दाऊद शेख यांची विशेष उपस्थिती होती. तसेच मुंबईहून ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी इसहाक खडके (पप्पू सय्यद) आणि ऑल इंडिया मुस्लिम सलमानी बिरादरीचे मकसूद सलमानी शेख आवर्जून उपस्थित होते. चिंचणी येथून रऊफ शेख, तारापूर येथून गुलजार खलिफा यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिकांनी या प्रार्थना सभेत सहभागी होऊन अन्सारी यांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमात गुल मोहम्मद खान, सलाम शेख, मुन्ना शेख, राजू खान यांसह अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष आशाद शेख म्हणाले की, “शब्बीर अहमद अन्सारी यांनी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी जो क्रांतीचा दीप प्रज्वलित केला आहे, तो प्रकाश आपल्याला पुढे नेयचा आहे. अन्सारी यांच्या कार्याची माहिती पालकांनी आपल्या मुलांना द्यायला हवी, जेणेकरून त्यांच्या कार्याचा वारसा जपला जाईल.” दारुल उलूम गौसियाचे अध्यक्ष रफीक दाऊद शेख यांनी अन्सारी यांच्या निस्वार्थी सेवेचे कौतुक करताना सांगितले की, ते समाजाच्या सेवेसाठी झपाटलेले व्यक्तिमत्व होते, त्यांनी सुरू केलेले कार्य अखंडपणे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमाचा समारोप फातिहा पठण आणि नियाज वाटपाने करण्यात आला.
